“सरकार पास झालंय, पण…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर शरद पवारांची भूमिका
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले . राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे . . ठाकरे सरकार सध्या कोरोनाशी मुकाबला करत असून, राज्य सरकारच्या कामाबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध केली असून, शनिवारी पहिला भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. आज दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे .
“राज्यातील राजकारण सहा महिन्यांपूर्वी आपण बदलून टाकलं. सहा महिने हा एक परीक्षेचा काळ असतो. जसं पूर्वी वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा… अन् मग प्रगतीपुस्तक येतं पालकांकडे. तसं सहा महिन्यांचं प्रगतीपुस्तक पालक म्हणून आपल्याकडं आलंय का?”, असा प्रश्न राऊत यांनी पवारांना केला .
या प्रश्नाचं उत्तर देताना पवार म्हणाले की ,शरद पवार म्हणाले, “ही जी परीक्षा आता झाली, ती संपूर्ण परीक्षा झाली असं मला वाटत नाही. त्या परीक्षेमधील प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे. ही लेखी झाली आहे. लेखीमधील निकालावरून प्रॅक्टिकलमध्येही ते यशस्वी होतील, असं आता दिसतंय. त्यामुळे त्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच पूर्ण निष्कर्ष काढणं योग्य नाही. पण त्याच्यावर संधी नाही, असंही म्हणणं योग्य नाही. राज्याच्या विचाराच्या दृष्टीनं या सहा महिन्यात येत्या परीक्षेत विद्यार्थी पास झालेला आहे आणि तो पुढची परीक्षा, पुढचे पेपर सहजपणानं पूर्ण करेल”, असं शरद पवार म्हणाले. “आपण हे मुख्यमंत्र्यांविषयी सांगत आहात”, असा प्रश्न राऊत यांनी मध्येच विचारला. त्यावर पवार म्हणाले,”मुख्यमंत्री, शेवटी राज्यप्रमुख हा महत्त्वाचा असतो. त्याच्या खालची टीम काम करते,” असे शरद पवार म्हणाले .
तसेच शरद पवारांनी भारत -चीन यांच्यात सुरु असलेल्या तनवाबाबतही आपले मत मांडले . चीन आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आहे. त्यांचं टार्गेट आता भारत आहे. म्हणजे मोदी साहेबांनी तिथे जाऊन त्यांच्याशी दोस्ती केली. त्यांना इथे आणून झोपाळ्यावर बसवलं आणि भारतीय कपडे शिवले. हे सगळं करून आपण खूप मोठं काही तरी घडवून आणले , असे चित्र निर्माण केलं, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पुढे ते म्हणाले, एकमेकांच्या हातात हात घालून, गळाभेट करून दोन्ही देशांची दोस्ती होतेय, असं चित्र निर्माण केलं गेलं. पण गळाभेट ठीक आहे, शेकहँड ठीक आहे, पण अशानं दोन्ही देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात हे आता आपल्या लक्षात आलं असेल, असाही टोला पवारांनी मोदींना लगावला आहे.
नरेंद्र मोदी हे बारामतीत आले असताना शरद पवार हे माझे गुरु आहे असल्याचं म्हटलं होतं, त्यावरुन राजकारणात कोणी कोणाचाच गुरु नसतो, फक्त सोय पाहिली जाते असा टोला पवारांनी लगावला आहे.
मी नरेंद्र मोदींचा गुरु आहे असं सांगून त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच अर्थव्यवस्थेसंबंधीच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी एक गृहस्थ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, दुर्दैवाने काय झालं मला माहिती नाही. ते सोडून गेले, आता जी माणसं आहेत ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे ती सावरण्यासाठी आणखी एका डॉ. मनमोहन सिंग यांची गरज आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केले.
शेतीच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला पाहिजे, खासकरुन शेती आणि त्यांचे उत्पादन, शेतीशी संबंधित बाकीचे व्यवहार चालू आहेत. चालू नाहीत असं नाही, पण त्याला मार्केट नाही. मार्केट नसल्यामुळे सुरुवाताचे काही दिवस शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाचं पुढे जाऊन करायचं काय? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आला आहे. त्यानंतर मालाच्या किंमतीचे प्रश्न आले. त्यामुळे शेती, अर्थव्यवस्था संकटात आली. दुधासारखे जे शेतीचे जोडधंदे आहेत. त्याचा सप्लाय बंद झाल्यासारखी स्थिती होती. साधने नव्हती. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.
केंद्राकडे रिझर्व्ह बँक आहे, केंद्राकडे नोटा छापायचा अधिकार आहे. केंद्राकडे जागतिक बँका आणि एशियन बँकेकडून पैसे उभे करण्याची ताकद आहे. तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र बरेच काही करु शकतं जे राज्यांना शक्य नाही. राज्यांना उद्या कर्जरुपाने पैसा उभा करायचा असेल तर त्यांना स्वत:च्या निर्णयाने काही करता येत नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याने किती कर्ज काढायचं याची सीमा ठरवून दिलेली असते आणि त्यामुळे राज्यांना मर्यादा आहेत. या संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज काढून आपण राज्य स्थिरस्थावर केली तर आपण एक चौकट करु आणि घेतलेले कर्जही परत करु शकतो असा विश्वास शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.


