‘वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मरेड येथे वृक्षदिंडी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी ‘वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून, हरित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यातील जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यात पूर्व विदर्भ हरित म्हणून ओळखला जातो. मात्र आता पूर्व विदर्भातही गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अगदी 47 अंश सेल्सिअसच्याही पुढे जात आहे. त्यामुळे आता हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने यंदा 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, या मोहिमेत सर्वजण सहभागी होऊन दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण करतील.’ असे देखील म्हंटले.
यावेळी व्यासपिठावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरिया, खासदार कृपाल तुमाने, सर्वश्री आमदार प्रा. अनिल सोले, गिरीष व्यास, नागो गाणार, रामदास आंबटकर, सुधीर पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव हे उपस्थित होते.