कुलभूषण जाधव प्रकारणात आंतररराष्ट्रीय न्यायालयात भारताचा विजय, पाकिस्तानला चपराक
पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.
कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचे आरोप करत ११ एप्रिल २०१७ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मेरिटच्या आधारे भारताच्या बाजूने निकाल सुनावला. जाधव यांना काऊन्सिलर ऍक्सिस द्यायला हवा होता. मात्र तो त्यांना दिला गेला नाही, असे न्यायालयाने म्हटले. याबरोबर पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा, अशी सुचना देखील न्यायालयाने केली.
जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार होईपर्यंत त्यांना दिलेली शिक्षा स्थगित करण्यात येणार आहे. याशिवाय पाकिस्तानने जाधव यांना काऊन्सिलर ऍक्सिस द्यावा, अशी स्पष्ट सूचना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाने भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे.