EnvironmentFeaturedHealth & FitnessMaharashtra Govमुंबई

मुंबईत उद्यापासून संस्थात्मक क्वारंटाईनवर भर

कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला; राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिलासा

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, असा दिलासा देतानाच मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

या संवादतील महत्वाचे मुद्दे:

•     महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या.

•     कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे, तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे.

•     राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.

•     महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

•     राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी पाच वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.

•     कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई किटची गरज भासू नये यासाठी फोटो बूथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्या रूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबुथ बसविण्यात येणार आहे.

•     प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील.

•     मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.

•     कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. जर समजा कुठलीच उपाययोजना केली नाही तर काय होईल यासाठी गणितीय गृहितकावर आधारित रुग्णसंख्येची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कार्यवाही होत आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button