Maharashtra Govमुंबई

पंचनामे होईस्तोवर निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना तातडीची मदत रोखीने द्या : देवेंद्र फडणवीस

मुंबई-कोकणातील लोकप्रतिनिधींकडून घेतला आढावा, भाजपाच्या मदतचमू तातडीने रवाना होणार

मुंबई :- निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आज तातडीची मदत आवश्यक असल्याने पंचनामे पूर्ण होईस्तोवर तातडीची रोखीने मदत द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मुंबई आणि कोकण विभागातील लोकप्रतिनिधींकडून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या चक्रीवादळाने कोकणात प्रचंड नुकसान झालेले असल्याने राज्य सरकारने तातडीने कोकणवासियांना मदत करण्याची गरज आहे. शेती, फळबागा, घरे, मासेमार, वृक्ष उन्मळून पडणे, जनावरांचे मृत्यू, पायाभूत सुविधांना क्षती असे मोठेच नुकसान या वादळाने झाले. वीज आणि दूरध्वनी सेवा अद्यापही खंडित आहेत. अशास्थितीत पंचमाने तर त्वरेने करावेच लागतील. पण, तोवर तातडीने आणि रोखीने मदत करण्याची नितांत गरज आहे. केवळ रायगड नाही, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या भागात सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करावयाच्या मदतकार्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले. या संकटात प्रत्येक कोकणवासियांच्या पाठिशी भाजपा भक्कमपणे उभा असेल. मदतसामुग्रीसह तातडीने चमू कोकणात रवाना करण्याच्या दृष्टीने आज नियोजन करण्यात आले. कोरोनाच्या काळात जसे मदतकार्य भाजपाने उभे केले आणि आजही ते अव्याहतपणे सुरू आहे, तसेच आता कोकणात हे मदतकार्य केले जाईल. लोकप्रतिनिधी, संपर्कप्रमुख यांना तालुकानिहाय यासाठीच्या जबाबदारींचे वाटप करण्यात येणार आहे. या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री विनोद तावडे, आशीष शेलार, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड यांच्यासह मुंबई आणि कोकण विभागातील सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

संयुक्त अरब अमिरातीतील मराठी बांधवांशी संवाद

संयुक्त अरब अमिरातीत वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील मराठी बांधवांशी आज देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक संवाद साधला. आखाती देशांमध्ये अडकून असलेल्या महाराष्ट्रीयन बांधवांना परत येण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे सातत्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्कात आहेत. महाराष्ट्र सरकारने मधल्या काळात विमानांच्या लँडिंगला परवानगी नाकारल्यामुळे काही अडचणी आल्या होत्या. पण, आता परवानगी देण्यात आली आहे. आता 13 ला कुवैत, 15 ला कतार, 16 ला ओमान आणि 19 तारखेला अबुधाबी येथून विमाने महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे वंदे भारत मिशनच्या तिसर्‍या टप्प्यात अमिरातीतील मराठी बांधवांना मायदेशी परतता येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या चर्चेत महाराष्ट्र मंडळ, कुवैत, आमी परिवार युएई, जीएमबीएफ ग्लोबल दुबई, महाराष्ट्र मंडळ कतार, महाराष्ट्र मित्र, महाराष्ट्र मंडळ ओमान यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button