Maharashtra Govमुंबईवसई-विरार (Vasai-Virar)

कोरोनाशी लढताना प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांशी समन्वयाची भूमिका घ्यावी -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

पालघरमधील कोरोना परिस्थितीचा घेतला सविस्तर आढावा

वसई दि.२४ जून :- समाजाच्या जडणघडणीतील योगदानासाठी संविधानाने लोकप्रतिनिधींना महत्त्वाचे अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनाही विशेष अधिकार आहेत. परंतु वसई-विरार आयुक्त अथवा अधिकारी यांनी कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत लोकप्रतिनिधींना किंवा पत्रकारांना विचारत न घेता त्यांचा अवमान करणे उचित नाही .त्यांचे मार्गदर्शन घेणे हे समाजासाठी हितकारक आहे. त्यामुळे याचे महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाशी लढताना पालघर प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांशी समन्वयाची भूमिका घ्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज आयुक्तांकडे केली. आमची मागणी मान्य करून प्रशासकीय व्यवस्थेत बदल दिसला नाही तर विरोधी पक्षनेता म्हणून लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून सरकारला ठोस भूमिका घ्यायला लावू अशी ठाम भूमिकाही दरेकर यांनी आज मांडली. सरकारच्या माध्यमातून अपयश झाकण्यासाठी मृतांचे आणि रुग्णांच्या आकडे लपवले जात आहेत. व्यवस्थेतील दोष लपवणे हे जनतेच्या आणि आमच्याही सहन करण्यापलीकडे गेले आहे त्यामुळे प्रशासनाला आता बदलावं लागेल. अन्यथा टोकाची भूमिका घेऊ असा इशारा श्री. दरेकर यांनी दिला.

पालघरमधील कोरोना संबंधीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पालघर जिल्ह्यातील वसई-विरार मनपा प्रभाग समिती, आय (I) कार्यालय येथे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त पी. गंगाधरन यांची भेट घेऊन बैठकीच्या माध्यमातून पालघरमधील कोरोनाच्या परिस्थितीबबाबत चर्चा करून उपलब्ध आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, महापौर प्रविण शेट्टी,उप महापौर प्रकाश रॉड्रीग्ज,(आय) प्रभाग सभापती रॉयल डायस, अप्पर पोलिस अधिक्षक विजय सागर, प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे, तहसिलदार किरण सुरवसे, वैदयकीय अधिकारी डॉ.तब्बसुम काझी, भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक, नगरसेवक किरण भोईर, भाजप जिल्हा नेते शाम पाटकर, नालासोपारा शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील, वसई शहर भाजप अध्यक्ष दत्तू कडे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी सांगितले की, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. म्हणून कोरोनाचे संकट ओढावल्यापासून राज्यभर दौरा करत हॉस्पिटलची पाहणी आणि प्रशासनाशी चर्चा करत व्यवस्थेला हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय .अशाप्रकारच्या बैठकांच्या माध्यमातून विविध प्रशासकीय यंत्रणेतील कमतरता समजून यंत्रणा गतिशील व्हायला मदत व्हावी यासाठी आमचा दौरा उपयुक्त ठरतोय. पालघर जिल्ह्यात साधारणतः ३ हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण असून २,२०० च्या आसपास रुग्ण महानगरपालिका क्षेत्रात १०० हून अधिक मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत नेमकं काय चुकतंय? प्रशासन कुठे कमी पडतय त्याचा लेखाजोखा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठीत घेतल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुळे मृत्यू झाला आहे समजू शकतो कारण ही आपत्ती सर्वांवर आली आहे. परंतु, आरोग्य व्यवस्थेतील हेळसांडपणा हा जर मृत्यूला कारणीभूत असेल तर त्याला प्रशासन आणि सरकार त्यासाठी जबाबदार असते हे वारंवार सरकारला ठणकावून सांगितले आहे. याची अनेक उदाहरण सरकार समोर ठेवली आहेत. कधी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू होतो, तर कधी रुग्णालयाच्या दारात नेले व ऑक्सिजन नाही म्हणून मृत्यू होतो, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणून मृत्यू होतो, कोरोनाचे निदान झाले नसल्याने चार चौघात गेला प्रादुर्भाव झाला म्हणून कोरोना प्रादुर्भाव होतोय. या सर्व व्यवस्थेमधील उणिवा आहेत. या उणिवा मृत्युला कारणीभूत असतील तर याचा दोष संबंधित प्रशासकीय यंत्रणेला जातो मग ती महापालिका असो वा सरकार. म्हणून या व्यवस्थेत दुरुस्ती व्हावी आपण आयुक्त व संबंधित अधिका-यांसोबत येथील गंभीर परिस्थितीचा आढावा घेतल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांचा समवेत झालेल्या आढावा बैठकीत पालघरमध्ये ज्या व्यवस्था आहेत त्या बळकट केल्या जातील, रुग्णवाहिका परिपूर्ण नाही त्या सुरळीत करण्यात येतील, उपलब्ध खाटा, रुग्णवाहिका, हॉस्पिटल यांची माहिती देणारे डॅशबोर्ड तयार करण्यात येईल असे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. पालघर जिल्ह्यातील रुग्णालयात मेडिकल ऑफिसर ची आवश्यकता असून यासंदर्भात राज्याच्या सचिवांना किंवा आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करणार असून प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाही हा विषय सांगण्यात येईल. मेडिकल ऑफिसर तातडीने उपलब्ध होईल होण्यासाठी पाठपुरवा करण्यात येईल, त्याचप्रमाणे या ठिकाणी खाटा, ऑक्सिजन,व्हेंटिलेटर,फिजिशियन आणि मनुष्यबळ वाढवण्यासाठी सकारातमक सूचना दिल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

संवादातून वस्तुस्थिती समजते त्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आणि आपण पालघर जिल्ह्यात दौरा करतोय. याच माध्यमातून प्रशासनाला काही मदत असेल तर विरोधी पक्ष नेता म्हणून शासनाकडे दबाव टाकून ती मदत उपलब्ध करुन दिलेली आहे. पालघर जिल्ह्यात प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची विभिन्न मते आहेत. प्रशासनच्या म्हणण्यानुसार आरोग्य व्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना केल्या आहेत. त्याच वेळेला येथील अनेक गोष्टी नीट कार्यान्वित होत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधी करत आहेत. ही येथील वस्तुस्थिती आहे. ज्या गोष्टी उपलब्ध आहेत सांगितल्या जातात त्या उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ २० रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगितले जाते परंतु ५ आहेत,पुरेसे व्हेंटिलेटर असल्याचे सांगितले जाते, परंतु त्यातील काही नादुरुस्त आहेत.अशाप्रकारच्या अनेक बाबी या दौऱ्यात नोंद करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या माध्यमातून अपयश झाकण्यासाठी मृतांचे आणि रुग्णांच्या आकडे लपवले जात आहेत. व्यवस्थेतील दोष लपवणे हे जनतेच्या आणि आमच्याही सहन करण्यापलीकडे गेले आहे त्यामुळे प्रशासनाला आता बदलावं लागेल. अन्यथा टोकाची भूमिका घेऊ असा इशारा श्री. दरेकर यांनी दिला.

लोकशाहीत प्रसारमाध्यमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलेही अधिकारी किंवा आयुक्त यांना मनमानी करता येणार नाही. तरी,प्रशासनाने लोक प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यम यांच्या बैठका घेऊन संवाद साधावा,त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे .असे सूचित करून देखील आयुक्तांची वेगळी भूमिका राहिली तर आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा दरेकर यांनी दिला. पालिका आयुक्त,लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमे यांच्या सुसंवादातून कोरोनाच्या संकटाला एकजुटीने तोंड देण्यात येत आहे असा संदेश समाजात जावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी वसई-विरारा महापालिका हद्दीतील जिजी कॉलेज आणि रिध्दिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील क्वारांटाईन सेंटर ला ही विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button