शिक्षण

दिवाळीनंतर वाजणार शाळेची घंटा

अमरावती:  अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्याचे व्यवस्थापन व अंतिम निर्णय त्या त्या राज्यांकडे सोपवला आहे. त्यातच आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांकडून आलेल्या माहितीनुसार राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होतील असे सांगितले आहे.

राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही कडू यांनी स्पष्ट केले आहे.

टाळेबंदी लागू झाल्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद होती. आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी राज्य सरकार करत आहे. सर्व नियम व अटी ठेवुनच विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

शाळा सुरू करण्यापूर्वी एक धोरण आखण्यात येणार आहे. कोरोनाची सर्व काळजी घेऊन शाळा सुरू होतील अशी योजना सरकार आखत आहे.

एखाद्या शिक्षकाचे वय ५०च्या पुढे असेल तर त्यांच्या जागी दुसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का? तसेच काही कालावधीनंतर नियमित विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येऊ शकते का? असाही विचार सुरू असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.त्यामुळे आता लवकरच शाळेची घंटा वाजणार आहे.

यासाठी आता पालकांकडून काय प्रतिक्रिया येतात हेदेखील राज्य सरकारला पाहावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button