वस्त्रोद्योगप्रश्नी कारखानदार रस्त्यावर उतरणार
कोल्हापूर: मागील काही वर्षांपासून आर्थिक दुष्टचक्रातून मार्गक्रमण करणाऱ्या यंत्रमाग उद्योगाला सावरण्यासाठी शासनाने मदतीची भूमिका घेणे गरजेचे आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला. आपल्या हक्कांसाठी सर्व कारखानदारांनी एकजुटीने पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. येथील पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात यंत्रमाग उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी यासंदर्भात शहरातील विविध यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
यावेळी आ. आवाडे म्हणाले, २७ एच.पी.खाली यंत्रमागांना ७५ पैशांची आणि साध्या यंत्रमागाला एक रुपयाची अतिरिक्त सवलत मिळावी यासाठी दोन्हीच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले. परंतु, त्याचाही काहीजणांनी गैरसमज करून घेतला. ७५ पैशांची सवलत देण्यासाठी केवळ इचलकरंजीतील ३,००० युनिटसाठी १० कोटी
रुपये, तर २७ एच.पी.खालील १२,००० युनिटसाठी अवघे दोन कोटी रुपये लागणार आहेत आणि ते शासनाला शक्य आहे. म्हणूनच ज्यावेळी ७५ पैशांच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल त्यावेळी साध्या यंत्रमागासाठीसुद्धा सवलत मिळालीच पाहिजे. पाच टक्के व्याजाची सवलत केंद्र आणि राज्य शासन दोघांकडे मागणी करणे गरजेचे आहे. तसेच सूत खरेदी करताना यंत्रमागधारकांनी सजग राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, कोरोना काळात व्यवसायापेक्षा जगणे महत्त्वाचे होते आणि आपण ते जगलो. आता व्यवसायाला गती देण्याची गरज आहे. सध्या सूत दराचा प्रश्नभेडसावत असून, त्यासंदर्भात सूत व्यापारी, अडते, ट्रेडिंगधारक व सायझिंगधारकांची व्यापक बैठक घ्यावी. पक्ष-गट-तट विसरून सर्वांनी राजकारणविरहित एकजुटीने एकत्र येऊन साथ देणे आवश्यक आहे.
