पुणे: राज्यातील दहा लाख रेशन कार्ड धारकांनी धान्य खरेदी केलेली नाही. ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत आढळलेली ही कार्डे बोगस असल्याच्या संशय अन्न व नागरी पुरवठा विभागाला आहे. आता होणाऱ्या तपासणीत सलग पाच महिने धान्य न उचलणाऱ्यांच्या शिधापत्रिका निलंबित केल्या जाणार आहेत.
बोगस शिधापत्रिकांची क्षेत्रीयस्तरावर तपासणी होईपर्यंत या शिधापत्रिकेवर धान्य तात्पुरत्या स्वरूपात धान्य मिळण्यास अपात्र, असे लिहिण्यात येणार आहे. शिधापत्रिकांची तपासणी केल्यानंतर लाभार्थी धान्य घेण्यास इच्छुक असल्यास त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करून १४ फेब्रुवारीपर्यंत शिधापत्रिका योग्य योजनेत वर्ग केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील महिन्यापासून धान्य शिधापत्रिकेवर उपलब्ध होईल.
राज्यात १ कोटी ५० लाख शिधापत्रिकाधारक आहेत. शिधावाटप दुकानातून अंत्योदय योजना व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना प्राधान्याने धान्य दिले जाते. त्यासाठी आर्थिक निकष लावण्यात आले आहेत. वार्षिक १५ हजार रुपये उत्पन्न असलेल्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करण्यात आला आहे. शहरातील कुटुंबीयांना ५९ हजार रुपये तर ग्रामीण भागातील कुटुंबीयांना ४४ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे. वार्षिक ६० हजार रुपये उत्पन्न असलेल्यांना धान्य दिले जात नाही.

