Farmer’s Protest: १८ फेब्रुवारीला होणार रेलरोको आंदोलन
दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ७७ वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी संयुक्त मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे.
१८ फेब्रुवारीला ४ तास रेल्वे रोको करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. ८ फेब्रुवारीला देशभरात दुपारी १२ वाजेपासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रेल्वे रोको केला जाईल, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आता रेल्वे रुळावर उतणार असल्याचं स्पष्ट झालंय.
माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.
“कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडई, एमएसपी बंद झालेलं नाही. हे सत्य असून हे लपवून चर्चा करणं योग्य नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकर्यांना सांगितले आहे.
“आधी जे हक्क, व्यवस्था होत्या त्या नवीन कायद्यांनी काढून घेतलं आहे का हे शेतकऱ्यांनी सांगावं. पर्याय असताना विरोध का सुरु आहे. जिथे जास्त फायदा तिथे शेतकरी आपला माल विकू शकतात. या कायद्यात कोणतंही बंधन नसून पर्याय आहेत. जर कायदा लादला असेल तर विरोध करु शकतो,” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.