Sportsक्रिकेटक्रीडा

इशान किशनची तुफान फटकेबाजी, झारखंडच्या 422 धावा

मुंबई इंडियन्सच्या संघाने २०२०मध्ये झालेली IPL स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटवला. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे इशान किशन. त्याने मुंबईतर्फे खेळताना चौकार-षटकारांची बरसात केली होती. हीच लय कायम राखत त्याने पुन्हा एकदा दमदार फलंदाजी करून दाखवली.

विजय हजारे ट्रॉफीला शनिवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला दिवस इशानने गाजवला. झारखंडचा कर्णधार असलेल्या इशानने अवघ्या ९४ चेंडूत तब्बल १७३ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत १९ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. त्याने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ४२ चेंडूत त्याने पहिल्या ५० धावा केल्या. त्यानंतर त्याने तुफान फलंदाजी सुरू केली. ७४व्या चेंडूवर शतक तर ८६व्या चेंडूवर दीडशतक झळकावत त्याने आपली निवड सार्थ ठरवली.

झारखंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ४२२ धावांचा डोंगर उभारला. इशान किशनव्यतिरिक्त अनुकूल रॉय याने ३९ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांसह ७२ धावा कुटल्या. इंदोरच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात झारखंडने केलेली धावसंख्या ही विजय हजारे करंडक स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ठरली.

लवकरच, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी२० आणि वन डे मालिकेसाठी संघ जाहीर होणार आहे. इशान किशनने अशा प्रकारचे खेळी करत आपण अंतिम ११ खेळाडूंच्या शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button