विजय हजारे ट्रॉफी 2021 मध्ये बडोद्याच्या कृणाल पंड्याने झंझावाती खेळी केली. कृणाल पंड्याने ठोकलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर, बडोद्याने त्रिपुराचा सहा विकेट्स राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या त्रिपुराने 303 धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. मात्र कर्णधार कृणाल पंड्याच्या नाबाद 127 धावांच्या जोरावर, बडोद्याने हे आव्हान 49 व्या षटकात सहा विकेट्स राखून पार केलं. बडोद्याचा हा सलग दुसरा विजय आहे.
महत्वाचं म्हणजे कृणाल पंड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्याने 97 चेंडूत 20 चौकार आणि 1 षटकारांसह नाबाद 127 धावा कुटल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कृणाल पंड्याने ठोकलेलं हे पहिलंच शतक आहे. कृणाल पंड्याला विष्णू सोळंकीने जबरदस्त साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी केली. सोळंकीने 108 चेंडूत 11 चौकारांसह 97 धावा केल्या.
दरम्यान, या सामन्यात टॉस जिंकून बडोद्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्रिपुरा फलंदाजीसाठी मैदानात उतरे. त्रिपुराकडून उदियन बोस (56) आणि बिक्रकुमार दास (28) यांनी पहिल्या विकेटसाठी दमदार 88 धावांची सलामी दिली. त्यानंतर बिशाल घोष (50), कर्णधार मणिशंकर मुरासिंह (42) आणि रजत डे (नाबाद 32) यांनी मिळून त्रिपुराची धावसंख्या 300 पार पोहोचवली.
बडोद्याने त्रिपुराच्या 303 धावांचा यशस्वी पाठलाग केला. बडोद्याची सुरुवात खराब झाली. केदार देवधर (5) आणि स्मित पटेल (5) हे दोघे अवघ्या 13 धावात माघारी परतले. त्यानंतर विष्णू सोळंकीने संघाची पडझड रोखली. सोळंकीने दमदार फलंदाजी केली. मात्र या सामन्यात तो शतकापासून 3 धावा दूर राहिला. यापूर्वी गोव्याविरुद्धच्या सामन्यात सोळंकीने शतक ठोकलं होतं. शिवाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने दमदार फलंदाजी केली होती.
हार्दिक पंड्याचा भाऊ असलेला क्रुणालने भारतीय संघाचे टी-२० मध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १८ सामन्यात १२१ धावा आणि १४ विकेट घेतल्या आहेत. पण यावेळी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याचा संघात समावेश होऊ शकला नाही. विजय हजारे ट्रॉफीत अशीच धमाकेदार कामगिरी केल्यास त्याचा भारतीय संघात वनडेसाठी समावेश होऊ शकतो.
