ठाणे : लॉकडाउनमुळे लोकल बंद असल्याने सध्या अनेक चाकरमानी कामावर पोहोचण्यासाठी बस तसंच खासगी वाहनांचा वापर करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून लोकांना कामावर पोहोचण्यासाठी तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागत आहे. कल्याण-शीळफाटा रस्त्यावरही अशाच पद्धतीनं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे लोक त्रस्त आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने आता मनसेने पुढाकार घेतला आहे.
कल्याण-कल्याण शीळ मार्गावरील प्रवाश्यांची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनसेने वाहतूक सौजन्य सप्ताह सुरु केला आहे. कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने मनसेचे आमदार राजू पाटील हे चार दिवसापूर्वी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वाहतूक कोंडी प्रकरणी वाहतूक पोलिसांना फैलावर घेतले होते. मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल न घेण्यात आल्याने मनसेकडून ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेत ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु करण्यात आला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ही मोहीम सुरु केली असून ते स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. मनसेकडून ३० वॉर्डन नेमण्यात आले आहेत. हे वॉर्डन आठवडाभर कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचं काम करणार आहेत.
#कल्याण_शिळफाटा रस्त्यावरच्या असह्य वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी मनसे चा #ईच्छा_तिथे_मार्ग वाहतूक सप्ताह आजपासून सुरू.बेशिस्त वाहतुकीला चाप लावून व नियमांचे पालन करून ईच्छा शक्तीच्या जोरावर कल्याण शिळफाट्याची वाहतूक कोंडी फोडून दाखवू.@ThaneTraffic @mnsadhikrut pic.twitter.com/ZtyGmvKX8c
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 28, 2020
राजू पाटील यांनी ट्विट करत फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी मनसैनिक वाहतूक कोंडी फोडणार असून कल्याण-डोंबिवलीकरांची असह्य वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी “वाहतूक सौजन्य सप्ताह” सुरु केल्याचं सांगितलं आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर कल्याण-शिळफाटा रोडवरील वाहतूक कोडी कशी फोडता येऊ शकते याचा ट्रेलर पहायला मिळेल असंही ते म्हणाले आहेत. राजू पाटील यांनी सर्व नागरिक आणि वाहनचालकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.



