भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवला. ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६४ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली साथ यांच्या जोरावर भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. सामन्यात आठ बळी घेणारा आणि दमदार शतक झळकावणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर ठरला. या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
भारतात आपल्या नेतृत्वात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावे आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली ३० पैकी २१ सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने आता २८ सामन्यांत २१ सामने जिंकले असून या प्रकरणात धोनीची बरोबरी केली आहे. पुढील २ कसोटी सामन्यांमध्येही कोहली धोनीला मागे टाकू शकतो. या प्रकरणात, मोहम्मद अझरुद्दीन २० सामन्यांत १३ विजयांसह तिसर्या स्थानावर आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका २-१ ने जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावले होते. पण इंग्लंडविरूद्ध पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. असे असताना दुसऱ्या सामन्यात रोहितचे दीडशतक, अश्विनचे शतक, विराट-रहाणे-पंतची झुंजार अर्धशतके आणि अश्विन-अक्षर-कुलदीपची फिरकी यांच्या बळावर भारताने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. याचसोबत विराटने घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून २१ कसोटी विजय मिळवले. धोनीनेदेखील आपल्या कारकिर्दीत मायदेशात २१ कसोटी विजय मिळवले होते. त्या पराक्रमाशी विराटने बरोबरी केली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत करून नेत्रदीपक विजय नोंदविला. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी पराभूत केल्यावर दुसर्या सामन्यात भारताने जबरदस्त पुनरागमन केले. या सामन्यात इंग्लंडवरील तिन्ही विभागांत भारत भारी होता. या विजयासह भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
