आशिष शेलार यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र : महाराष्ट्रात अडकून पडलेल्या चाकरमान्यांवर अन्याय
मुंबई: राज्यात जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे राज्याअतंर्गत अनेक श्रमिक, कामगार अडकून पडले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आरोग्य तपासणी करून अशा श्रमिकांना तातडीने त्यांच्या मूळ गावी सोडल्यास त्यांची होणारी कुचंबणा व गैरसोय कमी होईल. यातील अनेक श्रमिक, मजूर हे जिल्ह्यांच्या सीमांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या अन्नपाण्याच्या सुविधेसह आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
आशिष शेलार यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र :
आपण राज्य शासनातर्फे परराज्यातील मजूर व कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याचे नियोजन करीत आहात. त्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गर्दी करून आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्याकडे वेळीच शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. दिनांक ४ मे रोजी भाभा रुग्णालय येथे मजुरांनी केलेल्या गर्दीने आरोग्याचे नियम पाळण्यात आले नाहीत.
महाराष्ट्र शासन महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील मजूरांना ना वेळेत अन्नपाणी दिले ना त्यांची जाण्याची व्यवस्था करु शकले. त्यांचे दुर्दैवाने हाल सुरुच आहेत. किमान आपल्या राज्यातील श्रमिक, चाकरमान्यांना आरोग्य तपासणी करुन त्यांच्या मुळ गावी जाण्याची मोफत व्यवस्था करा! 1/2 pic.twitter.com/qGuFMmc1yJ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 5, 2020
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवताना महाराष्ट्रात अडकून पडलेल्या चाकरमान्यांवर अन्याय होत असल्याचे मत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले. कामाच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने जे तरुण कोकण, विदर्भ, मराठवाड्यातून पुणे-मुंबईत आलेत, त्यांना त्यांच्या मूळ गावी मोफत पाठवण्यात यावे, अशी मागणी शेलार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
2/2 pic.twitter.com/GQSDgXv99z
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 5, 2020
तसेच परराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असताना आपल्या महाराष्ट्रातून मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये कामानिमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय करीत आहोत. आपल्या विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यातील तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतील चाकरमानी मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात कामानिमित्त आलेले अनेक चाकारमानी अडून पडले आहेत. त्यामुळे शासनाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागातून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी मोफत पाठविण्याची व्यवस्था तातडीने करावी. तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून कोरोनाचा फैलावही रोखता येईल.


