ठाण्याच्या वाहतूक कोंडीवर खा. सुळे आणि आ. आव्हाडांनी मांडला मास्टर प्लॅन एमएमआरडीएकडून लवकरच मिळणार मंजुरी आणि निधी
ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आलेला तिसरा पूल आता थेट पटनी मैदानानजीक उतरविण्यात येणार असून तेथूनच विकास आराखड्यातील पटनी ते कोपरी या पुलाला तो जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून येणारी वाहतूक थेट हाय-वेला जोडली जाणार आहे. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. या संदर्भातील आराखडा सुप्रिया सुळे आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी तयार करुन घेतला असून त्यास एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी यांनी मंजुरीही दिली आहे.
ठाणे शहरात सध्या वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जेएनपीटीकडून येणारी वाहतूक टोल वाचविण्यासाठी कळवा मार्गे येत असते. त्यामुळे या भागात निर्माण झालेली वाहतूक कोंडी सबंध शहरावर परिणाम करते. त्यावर तोडगा काढण्यासाठी आ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रयत्नपूर्वक कळव्याच्या खाडीवरील तिसरा पूल मंजूर करुन घेतला. सध्या या पुलाचे काम वेगवान पद्धतीने सुरु आहे. आता या पुलाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. हा पूल आता थेट पटनी कंपनीमध्ये उतरविण्यात येणार आहे. तेथूनच विकास आराखड्यात मंजूर असलेल्या पटनी ते कोपरी पुलाला हा पूल जोडण्याचा प्रस्ताव आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडला आहे. विशेष म्हणजे, एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी यांनी ह्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. आ. आव्हाड आणि सोनिया सेठी यांच्यामध्ये झालेल्या प्राथमिक बैठकीमध्ये सेठी यांनी या प्रस्तावास तत्वत: मंजुरी दिली आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या पथकाने या भागाचा सर्व्हेदेखील केला आहे. त्याचा अहवाल 16 ऑगस्ट रोजी ठाणे महानगर पालिकेला सादर करण्यात आला आहे.
एमएमआरडीएकडून या पुलाच्या उभारणीसाठी निधी देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. विशेष म्हणजे, या पुलाचा आराखडाही आ. जितेंद्र् आव्हाड यांनी एका संस्थेकडून तयार करुन घेतला असून लवकरच या आराखड्याच्या मंजुरीसाठी ते खा. सुप्रिया सुळे यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोनिया सेठी यांची भेट घेणार असल्याचे आ. आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.



