भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना उर्वरित दोन कसोटी सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. २४ फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना दिवसरात्र खेळवण्यात येणार आहे. भारताचा हा तिसरा दिवसरात्र कसोटी सामना आहे. मोटेरा स्टेडियमवरील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळणार आहे.
मोटेरा स्टेडिअमवरील आकडेवारीवर नजर फिरवल्यास तिसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीपटूचा दबदबा असल्याचं दिसून येईल. मोटेरा स्टेडिअम आतापर्यंत फिरकीपटूनं ३६ च्या सरासरीनं १९९ बळी घेतले आहेत. तर वेगवान गोलंदाजांनी ३३.६ च्या सरासरीनं १५५ जणांचा बळी घेतला आहे.
“हा तिसरा कसोटी सामना टर्निंग पीचवर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया भारतात खेळत आहे. त्यामुळे टीम इंडियाला होम कंडिशनचा फायदा होणार आहे. तसेच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी संधी आहे”, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली.
गुलाबी चेंडूला फार चमक असते. ही चमक फिरकीपटूंसाठी मदतशीर असते. फिरकीपटू कर्ण शर्मानुसार, ” गुलाबी चेंडूने गोलंदाज कोणत्या पद्धतीने बोल फेकणार, याचा अंदाज बांधता येत नाही. डे नाईट सामन्यात हे आणखी अडचणीचं ठरतं. चेंडूमध्ये फार चमक असल्याने गुगली बोल समजायला फार वेळ लागतो.” कर्ण शर्मा दुलीप करंडकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
टीम इंडियाकडे आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यासारखे चार फिरकी गोलंदाज आहेत. यामुळे हे फिरकीपटू तिसऱ्या सामन्यात या पिचवर कशी कामगिरी करतात, याकडे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
