भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी सुरूवातीचे सत्र वगळता उर्वरित वेळात इंग्लंडने दमदार फलंदाजी केली. पहिल्या सत्रात २ गडी गमावल्यानंतर दुसऱ्या सत्रात पाहुण्या संघाने एकही चूक न करता डाव सावरला आणि पुढे नेला. सलामीवीर डॉम सिबलीने दुसऱ्याच सत्रात अर्धशतक ठोकलं. त्यानंतर कर्णधार जो रूटने आपली लय पकडत दिवसाच्या शेवटच्या सत्रात धमाकेदार शतक झळकावलं.
A hundred in his 100th Test for Joe Root 👏
Outstanding knock from the England skipper.#INDvENG | https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/KULnmIBRtA
— ICC (@ICC) February 5, 2021
जो रूट याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावत एक दमदार पराक्रम केला. त्याने भारतात खेळलेल्या सलग सात कसोटी सामन्यांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आणि भारतीय मैदानांवरही आपलीच ‘सत्ता’ असल्याचं दाखवून दिलं. जो रूटची भारतात खेळलेल्या एकूण सात कसोटी सामन्यांमधील धावसंख्या…
७३ आणि २०* – नागपूर
१२४ आणि ४ – राजकोट
५३ आणि २५ – विशाखापट्टणम
१५ आणि ७८ – मोहाली
२१ आणि ७७ – मुंबई
८८ आणि ६ – चेन्नई
५०+* चेन्नई
दरम्यान, जवळपास वर्षभराने भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारी सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने ६० चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्स धावांचं खातंही उघडू शकला नाही. पाचव्या चेंडूवर त्याला बुमराहने पायचीत केले. पण त्यानंतर पहिलं सत्र आणि दुसरं संपूर्ण सत्र सिबली-रूट जोडीने खेळून काढलं. सिबली-रूट जोडीने डावाची लय कायम संघाला चांगला पाया रचून दिला.
