महाराष्ट्रात येणार असाल तर सावधान..! कोरोना टेस्ट सक्तीची
मुंबई: देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वत्र पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मुंबई, पुण्यासह इतर शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कडक उपाय योजना करण्याकडे पावले उचलीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा येथून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. तुमचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्यावरच तुम्हाला महाराष्ट्रात प्रवेश मिळणार आहे.
दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. दिल्लीमध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तेथे मोठ्या संख्येने कोरोनारुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता या चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना टेस्ट बंधनकारक करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असल्याने त्यावर सतर्कता म्हणून राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी २५ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होतील.
या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचा आरटीपीसीआर निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. त्यात ही ७२ तास आधी या टेस्टचा अहवाल घेणं बंधन कारक आहे. जे प्रवाशी विमानांनी येणार आहेत आणि त्यांच्याकडे आटीपीसीआर टेस्ट अहवाल नसेल तर त्यांना स्व:खर्चाने कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. शिवाय सर्व विमानतळांवर टेस्ट सेंटर उभारण्याच्या सुचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर देखिल हे टेस्ट सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये जर बाधीत रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करुन उपचार केले जाणार आहेत.
नव्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यातून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ७२ तासाची कोव्हिड टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. तसेच दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक आहे. यासह जे प्रवासी रस्त्यांच्या मार्गे येणार आहेत त्यांनी आटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक आहे. तो अहवाल निगेटिव्ह असल्यावरच त्यांनी प्रवास करायचा आहे आणि या प्रवाशांनी स्वत:ची आरटीपीसीआर टेस्टही मागील ९६ तासांपूर्वी करणे आवश्यक आहे.



