अंबाबाईचे मंदिर बंदच राहणार; नवरात्रौत्सवाच्या पारंपरिक विधीवर मर्यादा
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे मंदिर दर्शनासाठी बंदच असणार आहे. याबाबत कोणताही निर्णय अद्याप राज्य शासनाने घेतलेला नाही. यामुळे सध्या तरी बंद मंदिरात नवरात्रौत्सवाचे पारंपरिक व धार्मिक विधी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहेत. शासनाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करून हे सर्व पारंपरिक विधी होतील.
कोरोना संसर्गामुळे मंदिरातील सर्व धार्मिक विधी हे शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. नवरात्रौत्सवाच्या काळात रोज होणारी पालखी, तसेच ललित पंचमी आणि दसरा सोहळा यासाठी शासनाच्या नियमानुसार व अटींची पूर्तता करून सर्व धार्मिक विधी करण्यात येणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.
प्रतिवर्षीप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विविध विभागांनी नवरात्रौत्सवाचा सोहळा सुरळीत व्हावा, यासाठी सहकाऱ्याचे आवाहन महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवरात्रौत्सवाच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीपेठेतील देवस्थान समितीच्या मुख्य कायार्लयात ही बैठक झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचना व आवाहनानुसार इतर सणाप्रमाणेच नवरात्रौत्सवही पारंपरिक पद्धतीने गर्दी टाळून साधेपणाने उत्सव साजरा करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.