मुंबई: महाराष्ट्र सरकारला असे वाटते की, कोरोनाची लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचे आहे, असा टोमणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला मारला. सरकार कंगनासोबत लढण्यासाठी जेवढी शक्ती वापरते आहे त्याच्या ५० टक्के जरी कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तरी लोकांचे जीव वाचतील, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, या सरकारला आता कोरोना नाही, कंगनाशी लढायचे आहे, असे वाटते. संपूर्ण प्रशासन कंगनाशी लढण्यासाठी सज्ज झाले आहे. सरकारला काय चौकशी करायची आहे ते करू शकतात. कंगनानेही ते सांगितलं आहे. पण कुठे तरी गांभीर्याने कोरोनाकडे लक्ष द्या. जितक्या तत्परतेने कंगनाची चौकशी करणे वगैरे सुरू आहे त्यापेक्षा जास्त कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात रोज कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे.
देशातील कोरोनाच्या रुग्णांपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. पण कोरोनासोबत लढायचे सोडून सरकार कंगनाशी लढते आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. कंगनाचा मुद्दा भाजपाने उचललेला नाही, असे सांगून फडणवीस यांनी सरकारला विचारले – तुम्ही कशाला कंगनाविरोधात बोलायला सुरुवात केली? वाद राष्ट्रीय स्तरावर जाईल इतके महत्त्व कशाला दिले? तिचे घर का तोडले? कंगना भाजपाच्या संपर्कात असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला.


