राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप
डबेवाल्यांसारख्या परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो
मुंबई: मुंबईतील डबेवाल्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सायकल वाटप करण्यात आले. मुंबईतील सर्व डबेवाले मेहनत करून लोकांना जेवण पोहोचविण्याचे पुण्यकर्म करीत आहेत. चांगले काम करणाऱ्याला ईश्वर नेहमी मदत करीत असतो. आज डबेवाले सायकलवरून फिरत असले. तरीही त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून मोटरकार व विमानाने फिरतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे.
श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपाल म्हणाले की परोपकार करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे, त्याचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. आपल्या देशात गरिबात गरीब व्यक्तिमध्ये देखील आपल्या ताटातून अर्धे जेवण दुसर्या गरजूला देण्याची भावना आहे. अशा परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो, असे त्यांनी सांगितले.
श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानचे शुभ्रांशु दिक्षीत यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्रतिष्ठानतर्फे करोना काळात केलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. करोना काळात अनेक डब्बेवाल्यांच्या सायकली बंद पडून बिघडल्या व त्यांचा रोजगारही गेला. या सर्वांना पुनश्च रोजगार मिळवा या दृष्टीने सायकल वाटप करण्याचे ठरवले, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई डब्बावाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर उपस्थित होते.

