प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन
मनोरंजन विश्वासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्याने ५ ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समजल्यानंतर अभिनेता कमल हसन एमजीएम रुग्णालयात गेले. काही दिवसांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी व्हिडीओ जारी केला होता आणि आपण बरं असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.
प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं शुक्रवारी दुपारी निधन झालं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या जाण्याने परिवारासोबतच म्युझिक इंडस्ट्री आणि त्यांच्या फॅन्सना मोठा धक्का बसलाय. सोशल मीडियावरून अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. बालसुब्रमण्यम हे केवळ एक चांगले गायकच नाही तर तेवढेच कमाल डबिंग आर्टिस्टही होते. डबिंगसाठी त्यांना दोनदा नंदी पुरस्कारही मिळाला आहे. नंदी पुरस्कार तेलुगू सिनेमा, थिएटर आणि टीव्ही आंध्रप्रदेश सरकारचा सर्वोच्च सन्मान आहे.
गायक असण्यासोबतच बालसुब्रमण्यम हे अनिल कपूर गिरीश कर्नाड, मोहनलाल, रजनीकांतसारख्या कलाकारांसाठी तेलुगूमध्ये डबिंगही करत होते. करिअरच्या सुरूवातीपासून आतापर्यंत त्यांनी अनेक तमिळ आणि तेलुगू सिनेमात कामही केलं आहे. हिंदी गाण्यांबाबत सांगायचं तर हिट गाण्यांची यादी मोठी आहे. यात त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांमध्ये ‘सच मेरे यार है’,’ओ मारिया’, ‘दिल दीवाना’, ‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’, मेरे रंग में रंगने वाली, ‘दीदी तेरा देवर दीवाना, पहला पहला प्यार है और ‘रोजा जानेमन’ सारख्या गाण्यांचा समावेश करावा लागेल.
१९४६ मध्ये जन्मलेल्या एसपी बालासुब्रमण्यम यांना सुरूवातीपासून संगीतात रस होता. त्यांनी गायनासाठी कित्येक अवॉर्डही जिंकले आहेत. बालासुब्रमण्यम यांना सहा नॅशनल अवॉर्ड्स मिळाले आहेत तेही चार वेगवेगळ्या भाषांमध्ये. दक्षिण भारतात जन्मलेले बालासुब्रमण्यम हे खुलेआम सांगायचे की, त्यांना गाण्याचा भाव आणि प्रेरणा हिंदी गाण्यांमधून मिळाली. ते खासकरून मोहम्मद रफी यांचे मोठे फॅन होते.
तसं हे फार कमी लोकांना माहीत आहे की, बालासुब्रमण्यम यांना संगीताची आवड असली तरी त्यांना इंजिनिअर बनायचं होतं. तसेच ते गाण्यांसाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक गाण्यांसाठी संगीत दिग्दर्शनही केलं आहे. १९६६ मध्ये आलेल्या श्रीश्री मर्यादा रामन्ना या तमिळ सिनेमासाठी त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं. ‘मैंने प्यार किया’ मधील सलमान खानची गाणी त्यांनीच गायली होती.
६० दशकांपासून गायनात सक्रिय असलेले बालासुब्रमण्यम हे वयाच्या ७४ व्या वर्षांपर्यंत सक्रिय होते आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होत. बालासुब्रमण्यम यांची खासियत म्हणजे त्यांनी शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं नव्हतं. त्यांची एक बाब फार प्रसिद्ध आहे की, त्यांनी एका दिवसात २१ कन्नड गाण्यांची रेकॉर्डींग करून रेकॉर्ड बनवला होता. असा दावा केला जातो की, सर्वात जास्त गाणी गाण्याचा(साधारण ४ हजार) रेकॉर्डही त्यांच्याच नावावर आहे. पण स्वत: एसपी बालासुब्रमण्यम हे २०१६ मध्ये म्हणाले होते की, ते आता आकडा विसरले आहेत.

