“बाबरी मशीद उध्वस्त करण्यासाठी पूर्वनियोजित कट नव्हता” – CBI न्यायालय ; सर्व आरोपी निर्दोष !
बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला.
देशासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. “बाबरी मशीद उध्वस्त करण्यासाठी पूर्वनियोजित कट नव्हता”, असे म्हणत लखनौच्या CBI न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ६ डिसेंबर, १९९२ सालच्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात भाजपचे अनेक दिग्गज नेते आरोपी होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याणसिंग, विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय आणि साध्वी ऋतंभरा हे मोठे चेहरे या प्रकरणात आरोपी होते. मात्र, आज लखनौच्या CBI न्यायालयाने अशा एकूण ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होते. बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली, असे मत न्यायधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी मांडले. कारसेवकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली होती. 28 वर्ष चाललेल्या या खटल्याने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली.
या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात एकूण ४९ आरोपी होते. आतापर्यंत त्यापैकी १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित ३२ मुख्य आरोपींबाबतचा निकाल आज लखनौ न्यायालयाकडून जाहीर करण्यात येणार होता. या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना न्यायाधीश एस. के. यादव यांनी असे स्पष्ट केले आहे कि, “बाबरी मशीद पाडण्याची घटना हा पूर्वनियोजित कट नव्हता. त्या घटनेबाबत कोणताही पुरावा नाही. या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष आहेत. त्याचप्रमाणे, त्यावेळी कारसेवकांना रोखण्याचाही प्रयत्न झाला”, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
