जळगाव हादरलं, शेतात राहणाऱ्या चार अल्पवयीन भावा-बहिणींची कुऱ्हाडीने हत्या
जळगाव : जळगावमधून राज्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. रावेरजवळच असलेल्या बोरखेडा शिवारातील शेतातील एका घरात चार अल्पवयीन भावा-बहिणींची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच वेळी चार अल्पवयीन मुलांच्या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील मुस्तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) येथे गेले आहे. घरात त्यांची चारही मुले एकटी होती. त्यातील सविता (वय १२ वर्ष) राहुल (वय ११ वर्ष ) अनिल (वय ८ वर्ष) आणि राणी (वय ३ वर्ष) एकटीच राहत होती. मोठी मुलगी सविता ही सर्वांची देखभाल करत होती. शेता शेजारीच हे कुटुंब घर बांधून राहत होते.
गुरुवारी रात्री घरात गाढ झोपलेल्या सविता, राहुल, अनिल व राणी या चारही मुलांची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्हाडीने घाव घालून हत्या केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. घटनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.