राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग २ सप्टेंबरपासून सुरु !
मुंबई: देशातील आणि राज्यातील लॉकडाईन शिथिलीकरणाच्या या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. या संदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे
पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे रेल्वेने या पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. सर्व प्रवाशांना राज्यांतर्गत प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून तिकीट बुकींग करता येणार आहे. देशभरामध्ये मार्च महिन्यात लॉकडाउन सुरु झाल्यानंतर प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. लॉकडाउनदरम्यान परराज्यातील कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन्स चालवण्यात आल्या.मुंबईतील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी विशेष लोकल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. मुंबई लोकल मात्र अद्याप बंद आहे.
काल राज्य सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करत प्रवासावरील निर्बंध काढल्याची घोषणा केली. नवी मार्गदर्शक तत्त्वे आत अमलात येतील आणि ई-पासही रद्द होईल. नव्या अधिसुचनेनुसार सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे सुरू करण्यास मुभा दिली असली तरी राज्यात आणखी महिनाभर तरी मेट्रो बंदच राहील. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत ई-पास रद्द करण्याची मागणी मान्य केली आणि प्रवासाला मुभा दिली.



