अर्णब गोस्वामींविरोधात शिवसेनेचा हक्कभंग प्रस्ताव
मुंबई: अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला राजकीय वळण आले आहे. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन आजच्या विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनात गोंधळ झाला. अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना सभागृहात आक्रमक झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.
“अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी” अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. तसेच, अर्णब गोस्वामी हे स्वत खटला चालवत आहेत आणि निकाल देत आहेत असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. त्यामूळे रिपब्लिक वाहिनी बंद करावी आणि त्यांच्याविरोधात हक्कभंगाची तक्रार करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे.


