‘मुंबईत हे होणारच होतं, आता कुठे आहेत ते?’ आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला
मुंबई :- मुंबईसह उपनगरात आज झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे . ‘मुंबईत ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करणारे आणि कंत्राटदारांची पाठराखण करणारे आता कुठे आहेत?’ असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
पालिका व राज्य सरकार या वर्षी करोनाच्या लढाईत गुंतल्यानं मुंबईतील पावसाळापूर्व नालेसफाई रखडली होती. त्यातच सफाई कामगार व मजूर गावाकडं परतल्यानं तो एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चहल यांनी यात लक्ष घालून नालेसफाईच्या कामांना वेग देण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याच्या आधी नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर काही दिवसांनी नालेसफाई झाल्याचे दावेही पालिकेने केले होते. मात्र, कालपासून मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे.
मुंबईत 113% नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण 40% पेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही.
आता कुठे आहेत ते 113% चे दावे करणारे?
कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020

