राज्यातील सत्ता टिकवणं तुमच्यासाठी संकट; प्रविण दरेकरांचा काँग्रेसवर निशाणा
मुंबई : भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे . “राज्यातील सत्ता टिकविणे हे तुमच्यासाठी संकट झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार एकत्र काम करत आहे, मग पृथ्वीराज चव्हाण यांना हे सरकार आपले का वाटत नाही का?,” असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला .
देशातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगड व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. अस असलं तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी. आम्ही सरकारला सूचना करू शकतो. त्या स्वीकारायच्या की नाही हे सरकारवर अवलंबून आहे, असे राहुल गांधी म्हणाले.यावरून दरेकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला .
आम्ही निर्णय घेणारे नाही असे राहुल गांधी का म्हणत आहेत? असा सवाल दरेकर यांनी केला. तुम्ही जर एकत्रित आहात तर विजय वडेट्टीवार यांनी १० हजार एसटी मोफत सोडण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले? उद्योग विषयक केंद्राच्या योजनांचा फायदा घेऊन धोरणे आखायला हवीत आणि महाराष्ट्राचे स्थान अबाधित ठेवायला हवे. पण उद्योगधंदे सुरळीत करण्याचे नियोजन या सरकारमध्ये नाही. ५० हजार उद्योग सुरु करण्याची घोषणा केली पण प्रत्यक्षात उद्योग सुरु झाले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार अस्थिर करण्याचे तुमच्याच मनाचे खेळ आहेत, अशा परिस्थितीत कोणीही सरकार अस्थिर करत नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वीही स्पष्ट केले आहे. पण केवळ तुमचे अपयश झाकण्यासाठी अस्थिर-अस्थिर अशी ओरड केली जात आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे वस्तुस्थितीपर मुद्दे मांडले ते खोडून काढण्यासाठी राज्यातील तीन मंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. पण ही पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार ठरला आणि महाविकास आघाडीची पत्रकार परिषद बिघाडी झाली,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे .

