महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचे कौतुक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. आज त्यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, येथील जिल्ह्यांच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेचा दर्जा चांगला ठेवून ती परिणामकारक करा यासाठी सूचना केल्या.
आज औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते, मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांच्या टास्क फोर्समधल्या डॉक्टर्सशी संवाद साधून वैद्यकीय उपचार व इतर उपायांच्याबाबतीत चर्चा करावी . पालक सचिव यांनीदेखील याबाबतीत तातडीने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात समन्वयाच्या दृष्टीने पालकमंत्री व जिल्हा प्रशासन यांनी संपर्कात राहावे असेही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्याने नो मास्क, नो एन्ट्री असा उपक्रम राबायला सुरुवात केली असून दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी यात सहभागी केले आहेत, गडचिरोली जिल्ह्याने या मोहिमेत महत्त्वाचा घटक असलेल्या आशा कार्यकर्तीला थँक्यू आशाताई असे पत्र देणे, अकोला जिल्ह्यात नो मास्क, नो सवारी अशी मोहीम तसेच सर्व रिक्षांमध्ये मोहिमेची गाणी वाजविणे किंवा पोस्टर्स लावणे, लोक कलावंतांचा उपयोग करून घेणे, माजी सैनिकांना पथकांमध्ये सहभागी करून घेणे व लोकांना आरोग्य तपासणीस तयार करणे, औरंगाबाद जिल्ह्याने दवंडी पिटणे, सकाळी शहरातल्या घंटा गाड्यांमध्ये मोहिमेची आकर्षक जाहिरात करणे, नांदेडचे कोरोना विलगीकरण अभियान, बीडमधील मेळावे, सहव्याधी रुग्णांना शोधण्यावर नाशिकने दिलेला भर इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम विविध जिल्हा प्रशासन राबवित आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे कौतुक केले आणि मोहीम मनापासून आणि दर्जेदार पद्धतीने चालवा अशीही सूचना केली.
सर्व विभागांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली असेल, आणि लक्षणे असतील त्यांची आरटी-पीसीआर चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठीच दोनदा स्वाब (द्राव्य) घेण्याच्या सूचनाही आम्ही दिल्या आहेत. राज्यात दर दहा लक्ष लोकसंख्येमागे ४५ हजारपेक्षा जास्त आरटीपीसीआर चाचणी केली जाते. पण या ४ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षा कितीतरी कमी चाचणी केली जाते ज्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे असेही ते म्हणाले.
जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जाऊ लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे आणि रुग्णाला डॉक्टरसोबतच औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे. औषधं उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण त्यांचा वापर करण्याचा निर्णय आणि जबाबदारी ही डॉक्टरांची आहे. त्यासाठी आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरित्या औषधांचा वापर होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यानंतरच्या उपचारातही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विभागाचा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सने निसंकोचपणे राज्यस्तरावरील टास्क फोर्सशी संपर्क साधावा. यातून राज्यातील मृत्यूदर कमीत कमी राहावा यासाठी करता येतील, ते सर्व प्रय़त्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक प्रदेशाची एक खासियत आहे, तिथे वेगवेगळ्या लोककलांची परंपरा आहे. या वेगवेगळ्या शैलींचा वापर करून आपल्याला या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. लॉकडाऊन हवे की जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. शाहिरी, खाडी गंमत, वाघ्या मुरळी, दशावतार, कीर्तन यासारख्या ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या माध्यमांचाही सध्याच्या परिस्थितीत योग्य ती आरोग्याची काळजी घेऊन उपयोग करून घ्यावे लागतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता आणि त्याच्या वाहतुकीबाबत केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. तसेच औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्यस्तरावरून केंद्रीय पद्धतीने समन्वयन सुरु असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या आधीचे सणवार आपण साधेपणाने साजरे केले आहेत. गणेशोत्सवही आपण साधेपणाने साजरा करण्यात यशस्वी झालो. आता आपल्याला येणारा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करायचा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आज या क्षणाला आपले राज्य हे एकमेव राज्य आहे की जे या कोरोनामुक्तीच्या कामाला जनचळवळ बनवते आहे; त्याशिवाय आपण कोरोनामुक्त होऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही केवळ प्रासंगिक आपत्ती नसून ती येणाऱ्या काळातल्या मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येणारी आपत्ती व लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावाच लागेल, जीवनशैली बदलावीच लागेल, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकांना औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंढे, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, वाशिमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड,नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील, नंदुरबार पालकमंत्री के सी पाडवी, धुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, नागपूर पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच सर्व संबंधित जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त यांची देखील उपस्थिती होती.
मुंबईहून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव राव आदी उपस्थित होते.


