कोरोना संकटावर मात करण्यासाठी ठाकरे सरकारचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल
मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . त्यातही मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत . यापार्श्वभूमीवर कोरोनाविरोधात लढ्यात राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकलं असून रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विट करत म्हणाले की, “महाराष्ट्र शासन रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोना व्हायरसमुळे होतो”. तसेच “जागतिक आरोग्य संघटना करोनाच्या उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात असे सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे, असेही टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले .
दरम्यान रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून कऱण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचे सांगितले होते .

