जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष, केंद्राशी विचारविनिमय करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : नेहमी जूनपासून सुरू होणारे शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या साथीमुळे जानेवारी ते डिसेंबर असे सुरू करता येईल काय, याबाबत केंद्राशी चर्चा करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात केली.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित होते. भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरू करता येतील का, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री म्हणाले की, या नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्या दृष्टीने राज्य सरकारला कायद्यात अनेक बदल करावे लागतील. काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावेच लागतील; जे स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्यात काही अडचणी आहेत तर त्याबाबतही विचार करावा लागेल. या धोरणाची सध्या केवळ घोषणा करण्यात आली आहे. आपण राज्यभरातील सर्व विभागांचे प्रतिनिधित्व असलेला तज्ज्ञ व संशोधक, अभ्यासक यांचा गट स्थापन करून या धोरणाच्या संदर्भात विचार करणे योग्य ठरेल.
यामध्ये तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण तसेच मातृभाषेतून शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल तसेच ते जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतील, याचा विचार करा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात शिक्षणाला सुरुवात झाली आहे. याबाबत शिक्षण विभाग ऑक्टोबरपर्यंत बदललेल्या स्थितीत विद्यार्थी, शिक्षक यांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाच्या फलश्रुतींचा आढावा घेऊ. अकरावी प्रवेशाचे काम व्यवस्थित सुरू आहे. पहिली ते बारावीपर्यंत २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे.

