काही खासगी लोकांच्या लाभासाठी वन विभागाला दिली जागा- फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेमधील ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. मात्र यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. काही खाजगी लोकांना लाभ पोहोचवण्यासाठी ही जागा वन विभागाला दिली जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
या निर्णयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या आरे कारशेडचे प्रकल्प ग्रीन ट्रॅब्युनल आणि सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविले, त्या आरे कारशेडची जागा काही खाजगी लोकांना लाभ पोहचवण्यासाठी वन विभागाला देणे चूक आहे. यामुळे मुंबईच्या विकासाला, मेट्रो-३ प्रकल्पाला खीळ बसेल. प्रकल्पाला उशीर होऊन किंमत वाढेल आणि त्याचा भुर्दंड मुंबईकरांना बसेल. कोणत्या खासगी लोकांना लाभ पोहचवण्यासाठी ही जागा वन विभागाला दिली जात आहे याचा खुलासा योग्य वेळी करेन, असंदेखील फडणवीस यांनी सांगितलं.


