धनंजय मुंडेंनी सुरू केले ‘कोरोना हेल्प सेंटर’!
बीड: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून त्यांच्या परळी येथील जगमित्र संपर्क कार्यालयात ‘कोरोना हेल्प सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. याद्वारे ‘हॅलो, मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय, आपली विचारपूस करण्यासाठी फोन केला आहे….’ यास्वरूपाचे कॉल बीड जिल्ह्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना येत आहेत.
गेले सात आठ महिन्यांपासून देश, राज्य, शहर, गाव कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. कोरोनाने आता प्रत्येक घराघरात आपले हातपाय पसरले आहे. यातून नेते अभिनेेतेही सुटलेले नाहीत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गरीब सर्वसामान्यांची राहम्या खाण्याची आबाळ झालेली आपण पाहिली आहे. त्यातच या महासाथीच्या रोगाने अनेकांचे प्राण घेतले आहे. पुर्ण देशवासी एकीकडे आर्थिक संकटात तर दुसरीकडे मानसिक त्राण अशा दुहेरी संकटात सापडला आहे. अशातच एखाद्याचा एक दिलासा देणारा फोन मोठे काम करत आहे.
कोरोनाने मामसामाणसांचा संपर्क तोडला आहे. अनेक नेते घरात राहून लोकांशी ऑनलाईन डुळलेले आहेत. त्यातच बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची बीडकरांशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
कोरोना बाधित रुग्णांची या हेल्पसेंटरद्वारे धनंजय मुंडे यांच्यावतीने दूरध्वनीवरून आस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. रुग्णांची विचारपूस करणे, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, काही मदत हवी का? एखाद्या रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास तिथे बेड उपलब्ध करून देणे, विविध औषधोपचार उपलब्ध करून देणे यासह रुग्णांकडून येणाऱ्या तक्रारी आदी दूर करण्यासाठी या हेल्पसेंटर द्वारे मदत करण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या कार्यालयाच्या वतीने ‘कोरोना हेल्प सेंटर’ असा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. याद्वारे २६ कर्मचारी अहोरात्र मदत कार्य करत आहेत; स्वतः धनंजय मुंडे देखील या ग्रुपचे सदस्य असून वेळोवेळी रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधितांना सूचना देत असतात.
कुठल्याही रुग्णाने उपचारासंबंधी कोणतीही मागणी किंवा तक्रार केल्यास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विविध कोविड रुग्णालये, तेथील डॉक्टर्स, खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर्स, मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर आदी मोठ्या शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालये, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आदी महत्वाच्या व्यक्तीना संबंधित रुग्णांची तक्रार निवारण करण्यासंबंधी तातडीने कळविण्यात येते व संबंधित अडचण सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येतो.
या हेल्प सेंटरच्या माध्यमातून कोरोनामुक्त होऊन आलेल्या रुग्णांची देखील विचारपूस करण्यात येते. खाजगी रुग्णालयांमध्ये बिलांमध्ये सवलत मिळवून देणे, बिलाची रक्कम कमी करून देण्यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा अन्य तत्सम योजनांमधून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
