महाराष्ट्रात एकाच दिवशी नऊ हजार कोरोना रुग्ण
मुंबई: कोरोनावर नियंत्रण मिळाले आहे असे दिसत असतानाच पुन्हा एकदा देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ९,८५५ रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या अभियानाला गती देण्यात येत आहे.
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण २१,७९,१८५ रुग्ण आहेत. तर बुधवारी राज्यात कोरोनामुळे ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ५२,२८० इतकी झाली.
मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आणि मास्कचा वापर न करणाऱ्यांना २०० रुपये दंड लावण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
देशात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यामध्ये ६० वर्षावरील नागरिकांना आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या टप्प्याला सोमवार एक मार्चपासून सुरुवात झाली असून या एकाच दिवशी तब्बल २५ लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंद केली आहे.