भारताला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भारताचा हा पराभव कसा झाला, याचे महत्वाचे कारण कर्णधार विराट कोहलीने सांगितले आहे.
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, ” सामन्याच्या पहिल्या डावात आम्ही इंग्लंडच्या फलंदाजांवर जास्त दडपण आणू शकलो नाही. अश्विन आणि अन्य गोलंदाज चांगली कामगिरी करत होता. पण तरीही इंग्लंडवर आम्ही दबाव बनवू शकतो नाही. खेळपट्टीमध्ये पहिल्या दोन्ही दिवशी गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नव्हती. खेळपट्टी ही संथ होती. त्यामुळे आमच्या गोलंदाजांना जास्त मदत मिळू शकली नाही.”
कोहली पुढे म्हणाला की, ” पहिल्या दोन्ही दिवशी खेळपट्टी संथ होती, त्यामुळेच इंग्लंडच्या फलंदाजांचेही कौतुक करावे लागेल. कारण त्यांनी व्यावसियाकपणा दाखवला. त्यांनी एकेरी धावा घेत स्ट्राइक बदलण्याचे काम केले. या गोष्टीचा फायदा नक्कीच इंग्लंडच्या फलंदाजांना झाला. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांचे कौतुक यावेळी करायला हवे.”
५७८ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात निराशाजनक फलंदाजीमुळे सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्णाण करण्यातही आम्हाला अपयश आलं. फलंदाजाच्या खराब कामगिरीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. आमच्या एका फलंदाजाने जरी शतक केले असते, तरी आम्हाला झुंज देण्याची संधी निर्माण झाली असती. मात्र, पहिल्या डावात इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली आणि याचा आम्हाला फटका बसला, असे कोहली म्हणाला.
भारताच्या गोलंदाजीबाबत कोहली म्हणाला की, ” भारतीय गोलंदाजांनी एक युनिट म्हणून काम करणे गरजेचे आहे. काहीवेळा तुम्ही रणनिती आखता आणि त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. पण यापुढे नक्कीच रणनितीची योग्य अंमलबजावणी कशी करता येईल, याकडे अधिक लक्ष दिले जाईल. या सामन्यामधून आम्हाला शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे पुढचा सामना खेळताना आमच्यामध्ये बरीच सुधारणा होईल. कारण आम्ही आतापर्यंत बरंच काही शिकत आलो आहोत.”
