‘जे दिसतात ते सोबत नसतात’; राष्ट्रवादीतला असंतोष अखेर मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातूनही उमटला!
मुंबई : मार्मिक चा हिरक महोत्सवी सोहळा नुकताच झाला. हा सोहळा यंदा व्हीडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच वर्तमानात चाललेल्या राजकीय घडामोडींना अनुसरूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक सुचक विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
‘मार्मिक’ या नियतकालिकास ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोरोनाच्या सावटामुळे यंदा हा सोहळा ऑनलाईन पार पडला.
मीपण नुकताच ६० वर्षांचा झालो व मार्मिकसोबतच वाढलो. मार्मिक शिवसेनेचा जन्मदाता असून ते ६० वर्षांचे होत असताना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचं समाधान असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या कुटुंबात पार्थमुळे महाभारत सुरू आहे. पार्थ पवारांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतल्याने आजोबा शरद पवारांनी नातू पार्थच्या मताला कवडीची किंमत नाही देत म्हणत जाहीरपणे फटकारले . त्यानंतर पवार कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला व पवारांच्या घरातील हे वादळ विद्यमान सरकारवरदेखील कोसळणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच राजकीय वर्तुळात अशी कुजबूजदेखील सुरू झाली आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीसोबतचे संबंध, सरकार पाडण्याबद्दल भाजपा नेत्यांकडून केली जाणारी विधानं याचे पडसाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात उमटले. एरवी आपण मेळाव्यात भेटतो तेव्हा तुम्ही सारे समोर असता. आज या ऑनलाइन मेळाव्यात सोबत आहात, पण दिसत नाहीत. सध्याचा काळच असा आहे की जे समोर दिसतात, ते सोबत नसतात आणि जे सोबत असतात ते दिसत नाहीत, असं सूचक विधान ठाकरेंनी केलं.
सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता मुख्यमंत्र्यांच्या या सुचक विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

