
सध्या सुरक्षा हा परवलीचा शब्द झाला आहे. विशेषत: २६/११ च्या घटनेनंतर पोलीस सजग झाले असून कोणत्याही परिस्थितीत कोणताही धोका पत्करायचा नाही असं पोलीसांचं धोरण दिसत आहे. आत्तापर्यंत मोठे नेते येणार असले की पोलीसांचा वावर प्रकर्षानं जाणवतो. मोठा बंदोबस्त, तपासण्या, श्वान पथकाकडून तपासणी, बॉम्बशोध नाशक पथकाकडून तपासणी असे प्रकार पहायला मिळतात. पण आता विसर्जनाच्या परिसरातही पोलीसांकडून अशीच कडेकोटी तपासणी केली जात आहे. आज गौरी-गणपतींचं विसर्जन असून ठाण्यामध्ये पूर्वेला असलेल्या खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर विसर्जन होतं.
अगदी माणसाच्या उंचीच्या आकाराच्या गौरींच्या मूर्ती विसर्जनासाठी खाडी किनारी येतात. हे बघायला या परिसरात मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीसांच्या बॉम्ब शोध नाशक पथकानं खाडी किनारा पिंजून काढला. बॉम्ब शोध नाशक पथकानं खाडी किना-याच्या कोप-यान् कोप-याची तपासणी केली. साधारणत: प्रथमच पोलीसांची अशी तपासणी पहायला मिळाली. पोलीसांशी समन्वय राखला तर कोणताही अनुचित प्रकार आपण टाळू शकतो असं बॉम्ब शोध नाशक पथकाचे पोलीस उपनिरिक्षक रोहित केदार यांनी सांगितलं.


