पावसाळ्याचा धोका लक्षात घेऊन लॉकडाऊन शिथिल कारण्याबाबत सरकारमध्ये दुमत
मुंबई : राज्यात जूनच्या सुरुवातीला मान्सून जोरदार हजेरी लावणार आहे . यापार्श्वभूमीवर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . राज्य सरकार किमान रेड झोनमध्ये आता लॉकडाऊन शिथिल करण्याच्या मन: स्थितीत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने रेड झोन लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास समर्थन दिले आहे .
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या अधिक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातही हे प्रमाण मुंबई, पुणे येथे अधिक आहे. दाट लोकवस्ती आणि गर्दीची ठिकाणे आदी कारणांमुळे या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने कोविड -१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र सरकार सावधगिरीने पाऊल ठेवत आहे. राज्य सरकाराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की , मुंबई आणि पुणे येथे जून अखेरपर्यंत सार्वजनिक मेळावे आणि रेल्वे आणि बस सारख्या सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध कायम राहतील. तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने आणि ऑटो स्पेयर पार्ट्सची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते. पावसाळ्यात केवळ कोविड -१९ नाही तर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस सारखे आजारही वाढतात त्यामुळे टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करणे चांगले,असेही ते म्हणाले .
लॉकडाऊनचा राज्य आणि देशातील अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा विपरित परिणाम झाला आहे. राज्य आणि देशातील उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. सहाजिकच या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. 40 दिवसांपेक्षाही अधिक काळापासून कारखाने, व्यापार, व्यवहार सारं काही बंद आहे. या सगळ्यात उद्योजकांना जसा फटका बसला आहे. तसाच, अनेक नागरिकांचे रोजगार गेले आहेत, असेही पवार या वेळी म्हणाले होते . त्यामुळे काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली होती . मात्र नंतर उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे त्वरित शिथिल करता येणार नाही, तर टप्प्याटप्प्याने केले जाईल, असे जाहीर केले .
महाराष्ट्रात जवळजवळ कोरोनग्रस्तांचा आकडा ४० हजार पर्यंत पोहोचला आहे . त्यातही २६ हजार कोरोनाबाधित एकट्या मुंबईत आहेत . परिणामी गर्दीने भरलेली रुग्णालये जिथे आयसीयू बेड, डॉक्टर, नर्स आणि व्हेंटिलेटरचा पुरवठाही कमी पडत आहे.

