महाराष्ट्रात आतापर्यंत १६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण झालेत बरे
मुंबई :- महाराष्ट्रात आतापर्यंत करोनाचे एकूण १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के झाला आहे. मागील २४ तासात ५ हजार १२३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आज राज्यात नवे २ हजार ८४० रुग्ण आढळलेत. मागील २४ तासांमध्ये ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली.
आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ९८ लाख ४७ लाख ४७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ५२ हजार ५०९ नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ९१ हजार १० व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर ५ हजार ३६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत व ८१ हजार ९२५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज महाराष्ट्रात रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ५२ हजार ५०९ झाली आहे.
आज नोंद झालेल्या ६८ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातले आहेत. तर १२ मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित पाच मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे पाच मृत्यू नाशिक-२, लातूर-१, पुणे-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.
मुंबईत आज ५४१ नवे करोना रुग्ण आढळलेत. १५६५ बरे झालेत. मागील २४ तासांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण २ लाख ७० हजार ६५४ जणांना करोनाची बाधा झाली. त्यातील २ लाख ४७ हजार ३३९ बरे झाले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत १० हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत ८ हजार ९४६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.