नुकसानग्रस्त कोकणाच्या मदतीसाठी पवारांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई : कोकणाच्या किनारपट्टीवर धडकल्या चक्रीवादळामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कोकणातील फळबागांना आणि शेतीला सर्वात मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रायगडचा दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच सध्या १०० कोटीची मदत करतो. यापुढे आणखी मदत केली जाईल अशी घोषणा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईला परत येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. वर्षा निवासस्थानावर ही बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबाबत, चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या लोकांना पुन्हा उभं कसं करायचं? याबाबत चर्चा झाली. सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजना आणि मदतीबद्दल मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचं झालेलं नुकसान कसं भरून काढायचं यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. कोकणातील फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा पुन्हा उभ्या करण्याबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

