क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण जवाहबाग येथील मुक्तिधाम स्मशानभूमीचे लोकार्पण
ठाणे महापालिकेच्या वतीने ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणार्या राम गणेश गडकरी रंगायतच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मृतीशिल्पाचे अनावरण देखील शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मृतीस्तंभाबरोबर स्वा. सावरकरांचे ने मजसी ने परत मातृभूमीला.. असे सागराला आवाहन करणारे त्यांचे गीतच या स्मृती शिल्पात चित्रबद्ध करण्यात आले आहे.

अंदमानच्या कारागृहातील स्वतंत्र भारताचे कृतीशिल स्वप्न पाहणारे सावरकर,तेथील जेलमधील त्यांची अवस्था,मनातील चलबिचल असाहयता त्यातून निर्माण झालेले काव्य हे दृश्य स्वरुपात स्मृतीस्तंभाद्वारे मांडण्यांत आले आहे. ठाणे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या प्रयत्नांने हे शिल्प साकारण्यात आले असून त्याची निर्मिती जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् मधून 1989 साली पदवी घेतलेले सुनिल चौधरी यांनी केली आहे.
ठाण्यातील मध्यवर्ती भागातील नूतनीकरण केलेल्या जवाहरबाग स्मशानभूमीचे लोकार्पणही शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणपूरक पद्धतीने या स्मशानभूमीचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले असून लाकुड आणि डिझेलचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. ठाणे महापालिका, जितो ट्रस्ट आणि सहियारा शैक्षणिक व वैद्यकीय ट्रस्टच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात आला आहे.



