प्रकाश आंबेडकरांचा कोरोनावर विश्वास नाही; सर्व मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा
मुंबई : देश, जग कोरोनामुळे हतबल झाले असताना राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळाच दावा केला आहे. आंबेडकरांच्या मते देशातील मृत्यू हे कोरोनामुळे नसून नैसर्गिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एवढेच नाही तर, कोरोनासारखा आजार आहे की नाही यावरही त्यांचा विश्वास नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहेच. जर १० कोटी लोकांमध्ये २००-२५० लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय? यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत.
आंबेडकर म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा पुरावा काय ? कोणाचाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपल्याकडे आहे का, ज्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असेल, असा प्रश्नही आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. ते बीबीसी मराठीसोबत बोलत होते.

