
देशाच्या पंतप्रधानांनी प्रारंभ केल्यानंतर स्वच्छता ही सेवा मोहिमेचा श्रीगणेशा ठाणे महापालिकेने केला असून लोकसहभागासह विविध प्रोत्साहनपर 14 उपक्रम राबवण्यात येत आहेत.हे स्वच्छता अभियान 02 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सोसायट्या आणि संकुलांना त्यांच्या कामगिरीनुसार पुरस्कारदेखील दिले जाणार आहेत.अशी माहिती ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवताना स्वच्छता ही सेवा हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थानादेखील बंधनकारक करण्यात आला आहे.या उपक्रमाच्या यशसस्वीतेसाठी लोकांचा सहभाग महत्वाचा असल्याने शहर स्वच्छतेची लोकचळवळ उभारण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे.
त्यानुसार,14 कलमी उपक्रम राबवताना विद्यार्थी,महिला, सामाजिक कार्यकर्ते आदींसोबत श्रमदान करण्यात येणार आहे.यासाठी प्रत्येकाने आपले घर स्वच्छ ठेवून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याऐवजी कचरा कसा कमी करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे असून स्थानिक स्तरावरच कच–याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.15 सप्टें.ते 2 ऑक्टो.या कालावधीत या उपक्रमात स्वच्छता प्रभात फेरी,पथनाट्य,नाटक यांच्या आंतरशालेय स्पर्धा होणार असून ठिकठिकाणी नागरिकांना स्वच्छता शपथ दिली जाणार आहे.त्याचबरोबर वृक्षारोपण आणि स्वच्छता दौड मोहीम राबवून सर्वाधिक कचरा गोळा करणाऱ्या समूहांचा आणि स्वच्छ आणि हरित शेजार या संकल्पनेतून स्वच्छता राखणाऱ्या सोसायट्यांचा गौरव केला जाणार आहे.


