लोकल ट्रेन आता लवकरच नेहमीप्रमाणे!
मुंबई: लोकल ट्रेन्स च्या वेळापत्रकात आता लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन नंतर लोकलच्या वेळापत्रकात बदल करून नियम लावले होते. आता काहीच दिवसांपूर्वी लोकलच्या वेळेत पुन्हा बदल केले आहे. पण या वेळ मर्यादेमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. कामावर बर्याच जणांना या वेळेच्या नियमांमुळे जाता येणे शक्य होत नाही आहे.यामुळे राज्य सरकारच्या विरोधात नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. याची दखल घेत काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळेत बदल करण्याचे संकेतही दिले होते त्याच नंतर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
काकाणी असे सांगतात की, “लोकल ट्रेनसह मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होणे हे कोरोनाच्या रुग्ण संख्येवर अवलंबून आहे. सर्वांसाठी लोकल खुली होऊन आठवडा उलटल्या नंतरही कोरोनाच्या रुग्णात वाढ झालेली नाही. जर ही परिस्थिती कायम राहिली तर लवकर वेळापत्रकात केलेले बदल हे काढण्यात येऊन ते नेहमीप्रमाणे केले जाईल.”
सध्या सकाळी पहिल्या गाडीपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लोकल सर्वाना खुली आहे. मुंबईकरांचे जीवन हे लोकल वर अवलंबून आहे. ही माहिती काकाणी यांनी देऊन मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

