सांगलतील मार्केटमध्ये 12 लाख क्विंटलने हळद आणि बेदाण्याची घटली आवक
सांगली : कोरोना महामारीमुळे राज्यभरातील बाजार समितीमध्ये सौदे बंद असल्याने शेतीमालाच्या आवकेवर मोठा परिणाम झाला आहे. सांगली मार्केट यार्डात गेल्या साडेपाच महिन्यात हळद, गुळ, बेदाण्याची आवक १२ लाख क्विंटलने कमी झाली आहे. परिणामी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक तसेच राज्यातील परपेठेतील शेतमालाचा थेट व्यापारही वाढला आहे. ही बाब सांगलीसह राज्यातील बाजार समित्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
‘लॉकडाऊन मुळे शेतमालाचे सौदे, व्यापार ठप्प झाला. ‘अनलॉक’नंतरही संसर्गाच्या धसक्याने मार्केट यार्डातील सौदे बंदच आहेत. मध्यंतरी ‘ई-टेंडर’द्वारे सौदे काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. बेदाणा व्यापाऱ्यांनी ई-टेंडरला विरोध करत खुल्या सौद्यांचा आग्रह धरला. पण सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. कोरोनाचा संसर्ग वाढेल म्हणून खुले सौदे काढले नाहीत. काही व्यापारी, अडते, हमाल कोरोना बाधित झाले. त्याचाही परिणाम सौद्यांवर झाला. त्यामुळे प्रायव्हेट व्यापार जोरात सुरू आहे. गतवर्षाशी तुलना करता गेल्या साडेपाच महिन्यात हळदीची आवक 7 लाख 91 हजार क्विंटलने कमी आहे. गुळाची आवक 90 हजार क्विंटलने घटली आहे. बेदाण्याची आवक 2 लाख 50 हजार क्विंटलने कमी झाली आहे.