सामान्यांना फटका ! इंधनाच्या दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढ!
वसई: कोरोनामुळे सामान्य लोकांना आर्थिक फटका सातत्याने सोसावा लागत आहे. लॉकडाऊन, अवकाळी पाऊस, आजार आणि बेरोजगारी यांचा सामना करावा लागत आहे. यातच भर इंधन दरवाढीमुळे पडली आहे. मागील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होऊन त्यांच्या किमतीने चक्क शंभरी पार केली. आणि त्याचाच परिणाम हा भाजी मंडईवर जाणवू लागला आहे. भाज्यांच्या किमतीत १५ ते २० रुपयाने वाढ झाली आहे. त्याची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे.
सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीचा परिणाम भाजीपाल्याच्या किमतीवर होत आहे. हंगाम असताना भाजीपाल्याच्या किमती कमी होण्या ऐवजी वाढत आहे. त्यामुळे त्याचा तोटा सर्वसामान्यांना होत आहे. किरकोळ बाजारात १५ ते २० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक असताना सुद्धा दर वाढत असल्याची तक्रार ही भाजी विक्रेत्यांनी केली आहे.
घाऊक बाजारात किलोमागे १० ते २० तर किरकोळ बाजारात १५ ते २० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक असतानाही दर वाढत असल्याचे विरारचे घाऊक भाजी विक्रेते तुकाराम बेकरे यांनी सांगितले.
कोरोनामुळे लागलेला लॉक डाऊन तसेच अवकाळी झालेला पाऊस याने सुद्धा भाज्यांचे दर वाढले असण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊसामुळे पिकांचे नुकसान झाले आणि भाज्यांचे दर वाढले. सामान्यांच्या घरातील आर्थिक गणित सुद्धा बिघडले. डिसेंबरमध्ये भाज्यांचे दर खाली आलेले पण इंधन दर वाढ ही डिसेंबर मध्ये झाल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आणि त्यामुळेच भाज्यांची दरवाढ झाली. १० ते १५ रुपयांपर्यंत ही वाढ झाली असून आगामी काळात हे दर कमी होण्याची शक्यता आहे.

