FinanceMaharashtra Govअधिवेशनविधान परिषद

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम; दुष्काळी परिस्थ‍ितीतही विकासाचा दर स्थिर- वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून दुष्काळी परिस्थ‍िती असतानाही कृषीपूरक व्यवसायांमुळे कृषी क्षेत्रात ०.४ टक्के वाढ झाली आहे आणि राज्याचा विकास दर ७.५ टक्के कायम राहिला आहे, असे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

श्री. केसरकर म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत शासन संवेदनशील असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी जागतिक बॅंकेच्या सहकार्याने योजना राबविण्यात येणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेंतर्गत ४ हजार २१० गावांचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात एक हजार २४७ गावांना याचवर्षी याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी ४ हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार असून दोन हजार कोटी रुपये जागतिक बॅंकेकडून देण्यात येणार आहेत तर दोन कोटी शासनामार्फत देण्यात येणार आहेत. दुष्काळी भागातील परिस्थिती समाधानकारक होईपर्यंत जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्या सुरु राहणार असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांच्या संदर्भात उत्तर देताना श्री. केसरकर म्हणाले, राज्यात स्वच्छता हे स्वतंत्र खाते असावे अशी सूचना करण्यात आली होती, यावर सविस्तर अभ्यास करून याबाबत निर्णय घेण्यात येईल.

देशातील ७९ लक्ष १६ हजार २९९ कंपन्यांनी येत्या काही कालावधीत भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांची नोंदणी झाली त्यात २० लक्ष खाती ही केवळ महाराष्ट्र राज्यातील होती. यावरुन राज्यात रोजगारात वाढ झाली आहे असे लक्षात येते, असे सदस्य शरद रणपिसे यांनी बेरोजगारीसंदर्भात व्यक्त केलेल्या भावनांना उत्तर देताना वित्त राज्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी लक्षात आणून दिलेल्या ग्रंथ विकास समितीच्या नेमणुकीसंदर्भात शासन तातडीने कार्यवाही करेल, असे आश्वासन श्री. केसरकर यांनी दिले. ते म्हणाले, राजगृह येथे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे ही भावना लक्षात घेऊन यावर आंबेडकर कुटुंबियांशी चर्चा करण्यात येईल. महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात येईल. तसेच विशेष बाब म्हणून मिलिंद महाविद्यालयाला निधी देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, यासाठीची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सदस्या श्रीमती हुस्नबानो खलिफे यांनी उपस्थित केलेल्या मत्स्य व्यवसायासंबंधातील मुद्यांच्या अनुषंगाने बोलताना राज्यात निलक्रांती व्हावी यासाठी आश्वासक पावले उचलल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले, राज्यातील मासेमारांनी मासेमारीबरोबरच मत्स्य शेती व्यवसायाचा पर्याय निवडावा यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाईल. मुंबई विद्यापीठ आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य संशोधनावर भर दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य हेमंत टकले यांनी पर्यावरण संवर्धन तसेच मराठी भाषा संवर्धन यासंदर्भात मुद्दे मांडले होते. त्यांनी सूचित केलेल्या मुद्यानुसार कृषी पदवीधरांना इंटर्नशीपसाठी प्रत्यक्ष शेतीवर पाठविण्याचा मुद्दा स्वागतार्ह असल्याचे वित्त राज्यमंत्री म्हणाले. यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतीसाठी होईल आणि पदवीधरांना प्रत्यक्ष कामात त्यांचे योगदान देता येणार आहे.

भाषणातील प्रमुख मुद्दे

  • राज्याच्या उत्पन्नात वाढ होत आहे. 2011-12 मध्ये राज्याचे उत्पन्न 56 हजार 972 कोटी रुपये, 2013-2014 मध्ये 69 हजार 777 कोटी रुपये होते. 2018-19 मध्ये हे उत्पन्न 1 लाख 28 हजार 895 रुपये इतके झाले आहे.
  • राज्यावरील ऋणभार मागील पाच वर्षापूवी 28.2 टक्क्यांपर्यंत गेला होता तो 15 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
  • कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांचा ऋणभार महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे.
  • उद्योगांमध्ये राज्याची प्रगती सुरू आहे. 2009-10 ते 2013-14 मध्ये थेट परदेशी गुंतवणूक सुमारे 1 लाख 80 हजार कोटी होती त्यावरुन गत पाच वर्षात 3 लाख 51 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे.
  • पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ लागू झाल्याच्या दिनांकापासूनचे मानधन देणार.
  • अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकासाठी बीकेसीमध्ये जागा शोधणार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या धर्तीवर स्मारक उभारणार.
  • लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबाद येथे स्मारक सिडको देणार निधी. महानगरपालिका करणार देखभाल दुरुस्ती
  • इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात ऑनलाईन लॉटरी सुरु करण्याचा मानस. लॉटरीतून मिळणारी रक्कम समाजोपयोगी कामासाठी वापरणार.

या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, शरद रणपिसे, जयंत पाटील, प्रसाद लाड, जगन्नाथ शिंदे, डॉ . सुधीर तांबे, दत्तात्रय सावंत, प्रा. अनिल सोले, नरेंद्र दराडे, गिरीशचंद्र व्यास, जोगेंद्र कवाडे, बाळाराम पाटील, प्रकाश गजभिये, हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण आणि श्रीमती हुस्नबानो खलीफे इत्यादी सदस्यांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button