औरंगाबादच्या विधि विद्यापीठास वाल्मीची कांचनवाडी येथील जमीन
औरंगाबादच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठास कांचनवाडी (जिल्हा औरंगाबाद) येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची (वाल्मी) 33 एकर जमीन विनामुल्य कब्जे हक्काने हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील युवकांना कायदेविषयक व्यावसायिक शिक्षण मिळण्यासाठी बेंगलोर येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर राज्यात विधि विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार औरंगाबादच्या पदमपुरा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाची सुरुवात वर्ष 2017 पासून तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली. या विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण विधि शिक्षणामुळे सामाजिक स्थैर्य, न्याय व विकासाला चालना मिळणार आहे.
राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी यापूर्वी कांचनवाडी येथील गट क्र. 19 मधील 17 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच्या निर्णयानुसार या विद्यापीठास उच्च व तंक्ष शिक्षण विभागांतर्गत कांचनवाडी येथील गट क्र. 17 व 18 मधील 33 एकर जमीन दिली जाणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आता एकूण 50 एकर जागा उपलब्ध झाली आहे.