अल्पसंख्याकांच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात : अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष – हाजी अरफात शेख
नवी मुंबई : अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. नवी मुंबईतील अल्पसंख्याक बहुल भागात महानगरपालिकेसह जिल्हा प्रशासनाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी आज दिले.
नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात मा. प्रधानमंत्री यांच्या पंधरा कलमी कार्यक्रमासह केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळीनवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ, उपमहापौर मंदाकिणी म्हात्रे, नगरसेवक मुनावर पटेल, अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी, तुषार पवार, अमोल यादव यांच्यासह गणेश सुरवसे यांच्यासह अधिकारी, नगरसेवक नवभारतीय शिववाहतुक संघटनेचे कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, सरचिटणीस विनय मोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. शेख म्हणाले, अल्पसख्यांक आयोगाचे कामकाज ठराविक समाजापुरते मर्यादित न ठेवता अल्पसंख्यांकात मोडणाऱ्या सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यामध्ये कोणताही घटक उपेक्षित राहता कामा नये. मुस्लिम बहुल समाजाच्या कब्रस्तानातील अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, पथदिवे, पाणी आदी मुलभूत सुविधांबाबत संवेदनशील राहून कामे होणे अपेक्षित आहे. अल्पसख्यांक संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निर्गमित करावेत. बैठकी दरम्यान अल हसनाद उर्दू शाळेची ३०० मुले रस्त्यावर असल्याची बाब शाळेच्या ट्रस्टीनी समोर आणली ही समस्यां समजून घेत नवी मुंबई शहरातील अल हसनाद ऊर्दू शाळेचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश देखील देण्यात आले. शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न होणे अपेक्षित आहे. स्वतः विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेला भेट देखील दिली.
यावेळी आयोगाचे अध्यक्ष श्री.शेख यांनी अल्पसख्यांक समाजासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा विभाग निहाय आढावा घेतला. पोलिस प्रशासनासह कौशल्य विकास कार्यक्रम राबविणाऱ्या यंत्रणेने पंधरा कलमी कार्यक्रमातील अनास्था दूर करून अल्पसंख्यांकांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मा. प्रधानमंत्री हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजासाठी सकारात्मक असून त्यांच्यासाठी विविध योजना राबवित असतात. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या अटी शिथील करण्यात आल्या असून या योजनेविषयी सखोल माहिती घेवून एम. एस.डी.पी. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या, तर महानगरपालिकामार्फत राज्य सरकारला सादर केलेल्या विविध प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्याचे आयोगाचे अध्यक्ष श्री.शेख यांनी आश्वस्थ केले.
